'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.

राजीव कासले | Updated: Sep 27, 2024, 08:05 PM IST
'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार title=

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीसांमधली (Devendra Fadanvis) राजकीय कटूता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. 31 जुलैला रंगशारदामध्ये उद्धव ठाकरेंनी मेळावा घेतला होता. याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निर्वाणीचा इशारा दिला होता. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहिन असा इशारा उद्धव ठाकरेंनी तेव्हा दिला होता. आता उद्धव ठाकरेंच्या याच इशाऱ्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय. कुणी कुणालाही संपवू शकत नाही. मला चक्रव्युहात शिरणंही ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहीत आहे. मी आधूनिक अभिमन्यू (Abhimanyu)आहे असा पलटवार फडणवीसांनी केलाय.

ठाकरेंचा वार आणि फडणवीसांचा पलटवार

- मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता..

- तर जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं म्हणत फडणवीसांनी पलटवार केलाय.

- मी सर्व सहन करून उभा राहिलो आहे असं उत्तर तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिलं होतं.

- तर मी आधुनिक अभिमन्यू आहे असा पलटवार फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय.

- मी तडफेने उतरलो आहे असंही उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते

- मला चक्रव्यूहात शिरणं ठाऊक आहे असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय

- आता एक तर तू राहशील किंवा मी राहिन असा इशाराच तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

- चक्रव्यूह भेदून बाहेर पडणंही माहीत आहे असा पलटवार फडणवीसांनी केलाय

आधूनिक अभिमन्यूवरुन सामना

आता फडणवीसांच्या मी आधूनिक अभिमन्यू या विधानावरुन राजकीय सामना रंगलाय. चक्रव्यूहात बेइमानी आडकत नाहीत. फडणवीस यांनी स्वतःची अभिमन्यू सोबत तुलना करू नये. ते योद्धे होते. काल कोरेगाव पार्कला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. हे मिस्टर सिंघम त्यांचा एन्काऊंटर करणार आहेत का ? त्यांनी स्वतःला योद्धा समजू नये, तो महाराष्ट्राचा अपमान ठरवला जाईल अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. तर फडणवीसांचा बाण राऊत यांच्या योग्य ठिकाणी घुसला आहे असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला.

2019 मध्ये महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होता. तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे महाआघाडीविरोधात लढत होते. मात्र आता परिस्थिती वेगळी झालीय.. निवडणुकीच्या महासंग्रामात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच आमनेसामने उभे ठाकलेत.. आणि दोघांमधला वाद दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसतोय.